पर्यटन विकासाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचा विकास साधणार! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
1973

पालघर, दि. 12 : पर्यटनाच्या दृष्टीने पालघर जिल्ह्याची भौगोलिक रचना अनुकूल असुन जिल्ह्याला विस्तीर्ण सागर किनारा लाभला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन स्थळाचा विकास करणे आवश्यक असल्याने पर्यटन विकासाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचा विकास साधणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जव्हार येथे केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले की, नव्याने जिल्हा अस्तित्वात आल्याने जिल्ह्यासाठी लागणार्‍या आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीचे काम लवकरच पुर्ण होऊन ही सर्व कार्यालये नागरिकांसाठी एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच येथील कुपोषण पुर्णपणे थांबवायचे असल्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात असुन आदिवासी समाजाला मुख्य धारेत आणून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

पालघर जिल्ह्याला समुद्र किनार्‍यासह हिल स्टेशन्स तसेच नैसर्गिक सानिध्य लाभल्याने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. येथील आदिवासी संस्कृती व परंपरा जपून समाजाचा विकास करण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगतानाच दळणवळण, रोजगार व पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

  • या दौर्‍यात मुख्यमंत्र्यांनी जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली.
  • यावेळी प्रवेशद्वारावर असलेल्या फळ्यावर लिहिलेल्या हस्ताक्षरांबद्दल विचारणा केल्याने मुख्यमंत्री कलाप्रेमी असल्याचे दिसून आले. तर विविध रंगात काढलेल्या रांगोळीतील बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र पाहून मुख्यमंत्री आनंदित झाले.
  • पालघर जिल्ह्यातील वारली पेंटिंग कला अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यातील चित्रांना संकल्पना देऊन विविध रंगात रंगविण्यात यावी. यासाठी मुलांचे लहान गट करण्यात यावेत. तसेच ही कला नव्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी, महिला अर्थिक महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वानगा, सुनिल भुसारा, रविंद्र फाटक, कोकण विभागाचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सलीमठ, वसई विरार महानगर पालिका आयुक्त डी. गंगाथरण, सहायक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, पी. नायर तसेच जिल्ह्यातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते.