स्थायी सेवा मिळाल्याने डॉक्टरांनी मानले विवेक पंडितांचे आभार

प्रतिनिधी/कुडुस, दि. 25 : राज्यात शासकीय वैद्यकीय आस्थापनेत इमाने इतबारे सेवा देणार्या बीएएमएस डॉक्टरांच्या लढ्याला अखेर यश आले असुन राज्यशासनाने 718 अस्थायी डॉक्टरांना स्थायी सेवेत समाविष्ट केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन सुरु असलेल्या या लढ्यात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि आताचे राज्याचे आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित (राज्यमंत्री दर्जा) यांनी या डॉक्टरांच्या न्याय्य हक्कासाठी प्रयत्न केले होते. श्रमजीवीने अनेक आंदोलनांमधुन या प्रश्नावर शासनाकडे न्यायाची मागणी केली होती. त्यामुळे विवेक पंडित यांच्यामुळेच हा लढा यशस्वी झाल्याचे सांगत या 718 बीएएमएस डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे आभार मानले.

राज्यात सर्वत्र विशेषतः आदिवासी दुर्गम भागातील शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये काम करणारे व सन 2015 पासून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात सेवेत घेतलेले 718 बी.ए.एम.एस. अर्हता धारक वैद्यकीय अधिकारी अस्थायी स्वरूपात कार्यरत होते. त्यांना नियमित स्वरूपाच्या सेवेचा कोणताही लाभ मिळत नसताना देखील अतिदुर्गम आदिवासी बहुल तसेच नक्षलग्रस्त भागात ते आरोग्य सेवा पुरवित होते. तर इतकी वर्ष सेवा देऊनही त्यांना स्थायी सेवेत समाविष्ट केले गेले नव्हते. श्रमजीवी संघटनेच्या कुपोषण मुक्तीच्या लढ्यादरम्यान या डॉक्टरांनी आपल्या व्यथा विवेक पंडित यांच्याकडे मांडल्या. त्यानंतर अनेकदा पंडित यांनी डॉक्टरांना यासाठी लढायला प्रेरित केले. राज्यभर एकाच वेळी काम करून आपल्या मागणीसाठी उपाशीपोटी आंदोलन करण्याची अभिनव कल्पना त्यांनी आखली व या लढ्यात श्रमजीवी देखील उतरली. लढ्याला विविध मार्गाने बळ देण्याचे काम पंडित यांनी केले. संघटनेच्या अनेकदा निघालेल्या भव्य मोर्चामध्ये या डॉक्टरांना कायम करावे ही मागणी लावून धरण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या अनेक बैठकांमध्ये पंडित यांनी याबाबत चर्चा केली. तसेच या डॉक्टरांच्या व्यथा त्यांनी राज्यपालांकडेही मांडल्या.
एवढेच नव्हे तर काही दुर्धर आजारी अधिकार्यांच्या उपचाराकरिता देखील विविध पातळीवर पंडित यांनी मदत केली. आज त्यांनी केलेल्या मदतीमुळे 718 अस्थायी वैद्यकीय अधिकार्यांना न्याय मिळाला व त्यांच्या सेवा स्थायी करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल विवेक पंडित यांच्या उसगाव येथील कार्यालयात या डॉक्टरांच्या वतीने डॉ. अरुण कोळी, डॉ. किरण पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे आभार व्यक्त केले.
या आभाराचा मानकरी मी नाही. मी केवळ माझे कर्तव्य पार पाडले असे सांगत, तुम्हा सर्वांकडून गरीब आदिवासी दुर्बल रुग्णांची सेवा घडावी आणि ती सेवा देण्यासाठी तुम्हाला बळ मिळावे या सदिच्छेने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले, असे उद्गार यावेळी पंडित यांनी काढले.