संजय लांडगे / वाडा: केशवसृष्टि ग्रामविकास योजना या संस्थेमार्फत पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यातील ४२ गावांमध्ये आंबा, काजू आणि पेरू या फळांच्या उच्च प्रतीची वीस हजार झाडे लावण्यात आली.
या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे व आसपासच्या विविध शहरांतील १२२८ लोक सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर, इंजीनियर, वकील, उद्योगपति, विविध कंपन्यांचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, युवक, स्वयंसेवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, समाजसेवक, वृक्षप्रेमी इत्यादी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
केशवसृष्टि योजनेच्या माध्यमातून वाडा, विक्रमगड व जव्हार तालुक्यातील ४२ गावांमध्ये ग्रामविकासाचे कार्य सुरू असून यामध्ये प्रामुख्याने जल, कृषि, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, उद्योग, सरकारी योजना, सौरऊर्जा, कौशल्य विकास या विषयांमध्ये मागील वर्षापासून कार्य सुरू आहे.
या वृक्षलागवडी साठी ४२ गावांतील १०३९ शेतकर्यांनी आपआपल्या शेतात तसेच उपलब्ध जागेत उन्हाळ्यात खड्डे तयार केले त्या प्रमाणे त्यांना फळझाडे विनामूल्य वाटप करण्यात आली. अनेक गावांमध्ये वृक्षदिंडी काढून पारंपारिक पद्धतीने रोपांची पूजाअर्चा करण्यात आली. तर वृक्ष लागवडी साठी सहभागी शहरातील नागरिकांसाठी त्या त्या गावातील एकुण १२४ शेतकर्यांनी आपआपल्या घरी भोजन व्यवस्था केली होती.
वृक्षारोपणात प्रामुख्याने फळ झाडांची लागवड केल्याने पुढील काही वर्षात शेतकर्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊन वृक्षारोपणा साठी आलेल्या शहरातील या नागरिकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध प्रस्थापित होतील, असा उद्देश या वृक्षारोपण कार्यक्रमामागे असतयाचे केशवसृष्टि चे विश्वस्त बिमल केडिया यांनी सांगितले. तर शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या वृक्षलागवडीत सहभागी झाल्याने शेतकर्यांना अत्यंत आनंद झाला आहे तसेच शहरातील जनतेला ग्रामीण संस्कृतिचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने ते देखील खूप समाधानी झाल्याचे अरविंद मार्डीकर व संतोष गायकवाड यांनी सांगितले.