डहाणू व तलासरीत भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी!

0
2218

आमदार कॉ. विनोद निकोलेंची सुभाष देसाईंकडे मागणी

प्रतिनिधी-नागपूर/डहाणू : डहाणू व तलासरीमध्ये सतत होत असलेल्या सौम्य व तीव्र भूकंपामुळे नागरिक येथील हवालदिल झाले आहेत. त्यामुळेे शासनाने याची तात्काळ दखल घेऊन नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी व त्यांचे पूर्वनियोजन करावे, अशी लेखी मागणी डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी भूकंप व पुर्नवसन मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

डहाणू, तलासरी, दापचरी, कवाडा, उधवा, वंकास, कासा अशा अनेक गावातील घरे भूकंपामुळे थरथर कापत आहेत. वर्षभरापासुन सौम्य व मध्यम स्वरूपाचे शेकडो धक्के या परिसरात सातत्याने सुरूच आहेत. महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील किल्लारीला झालेल्या भीषण भूकंपानंतर आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसन कार्याचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी यात सुसूत्रता असणे किती महत्त्वाचे आहे हे प्रथमच अधोरेखित झाले. महाराष्ट्रातील किल्लारीचा भूकंप ही संपूर्ण जगासाठी आणि भारतासाठी पहिली लक्षवेधी आपत्ती ठरली. तरी देखील ही गंभीर बाब विचारात घेऊन आज पालघरमध्ये होत असलेल्या भूकंपाची गंभीर दखल का घेतली जात नाही? असा सवाल करतानाच डहाणू व तलासरी तालुक्यात वारंवार बसणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांनी ग्रामस्थांवर मानसिक आघात केला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निकोले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

भूकंपाच्या या हादर्‍यांनी घरांच्या भिंतींना भेगा पडल्या असून काही घरे खचली आहेत. त्यामुळे या भागात सतत भूकंप का होत आहेत यावर संशोधन करण्यात यावे. तसेच भूकंपाचे लहानमोठे धक्के बसत असल्याने या धक्क्यांपासून होणारी संभाव्य जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने संबंधित भागात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करव्यात. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यात बसणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात व बाधित कुटूंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागण्या आमदार निकोले यांनी सदर पत्रातून केल्या आहेत.