
राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 17 : येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणार्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू असताना विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. 16 ते 17 ऑक्टोबर अशा दोन दिवसात विविध ठिकाणांहुन आचार संहिता भंगाचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी चार गुन्हे वसई मतदार संघातील असुन एक गुन्हा बोईसर मतदार संघातुन दाखल झाला आहे.
आज, गुरुवारी (दि.17) वसई तालुक्यातील भुईगाव पोलीस चौकीच्या बाजुला हिंदु जागरण पक्षाचे उमेदवार सुनिल मणि सिंह यांच्या निवडणुक प्रचार चिन्हाचे पोस्टर्स विद्युत महामंडळाच्या डीपी बॉक्सवर विनापरवाना चिकटवल्याने अनिल पांडे, राकेश पांडे व सुधा उपाध्याय अशा तिघांविरोधात, तर अशाचप्रकारे दत्तानी मॉलच्यासमोर, वसई महानगरपालिकेच्या बस स्थानकात सुनिल सिंह यांचे निवडणुक प्रचार चिन्हाचे स्टिकर चिकटवल्याने अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच काल 16 ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या नालासोपार्यातील चक्रधर नगरमधील हॉटेल ऑलिंपिक जवळील शाखेच्या परिसरात व अमिपार्क येथील शाखेच्या परिसरात विनापरवानगी बॅनर लावल्याने जितेंद्र शिंदे यांच्या विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 171, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 व लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 आणि 1988 चे कलम 127 नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान नालासोपारा पुर्वतील तुळींज नाका येथे निता शशिकांत पाटील ही महिला दारु विक्री करीत असताना आढळल्याने तिच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
बोईसर येथे 16 ऑक्टोबर रोजी डी.जे.नगर, बोईसर रेल्वे स्टेशन, नवापुर नाका व खैराफाटकाजवळील विद्युत पोलवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार व शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचे विनापरवागी बॅनर लावल्याने अज्ञात इसमांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.