पालघर, दि. 15 : डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी भागात नियमित भूकंपाचे धक्के बसत असून या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज, मंगळवारी या गावाला भेट देत भूकंपग्रस्त घरांची पाहणी केली व येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याच बरोबर भूकंपग्रस्त भागाचा पाहणी केलेला अहवाल तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे सादर करून तातडीच्या उपाययोजना व पुढे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील, असे सांगतानाच शासनाच्या वतीने भूकंग्रस्तांना भरीव मदत केली जाईल, असे आश्वासन भुसे यांनी याप्रसंगी दिले. भूकंपाच्या तीव्रतेचा परिणाम कमी करण्यासाठी तज्ञांची मदत घेऊन त्योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील तसेच भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरे तयार करण्यात येतील असे प्रतिपादनही त्यांनी केले.

यानंतर जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या भूकंपावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना या पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमा विषयी माहिती देताना, सर्वांनी आपल्या गावाकडे आपले कुटुंब म्हणून पाहिले पाहिजे. आपली जबाबदारी समजून त्याची काळजी घेतली पाहिजे. या योजनेत अधिकारी कर्मचारी यांची टीम तयार करून गावातील सदस्यांची तपासणी करून घ्यायची आहे. ही तपासणी कोव्हीड पुरती मर्यादित न राहता कुठल्याही आजाराचे निदान यातून करता येणार आहे व त्यातून सुदृढ नागरिक निर्माण करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेने या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, असे आवाहन यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांनी भूकंपामागील शास्त्रीय कारण प्रशासनाने शोधून काढले पाहिजे, असे मत व्यक्त केले. तर आमदार सुनील भुसारा यांनी भूकंपग्रस्त भागात निवारा स्थळ बनवणे गरजेचे आहे. जुन्या शाळा आहेत त्यांना धक्का बसल्यास गंभीर परिस्थिती उदभवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली. आमदार श्रीनिवास वणगा यांनी भविष्यात मोठा भूकंपाचा धक्का बसला तर काय उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, प्रांत अधिकारी श्रीमती मित्तल आदी उपस्थित होते.