
राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 18 : पालघर जिल्हा परिषदेवर दुसर्यांदा सदस्य म्हणून निवडून आलेल्या भारती भरत कामडी यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून निलेश भगवान सांबरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हा परिषद संकुल येथे आज, मंगळवारी झालेल्या निवड प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची घोषणा केली.


पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत नामनिर्देशन पत्रे देणे व स्वीकारण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदासाठी मनिषा यशवंत बुधर, भारती भरत कामडी व सुरेखा विठ्ठल थेतले यांनी नामनिर्देशनपत्र सादर केली. तसेच उपाध्यक्ष पदासाठी विष्णु लक्ष्मण कडव, निलेश भगवान सांबरे व जयवंत दामु डोंगरकर या सदस्यांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. मनिषा बुधर, भरती कामडी, सुरेखा थेतले यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राला अनुक्रमे मनिषा निमकर, वैशाली करबट व ज्योती पाटील यांनी सूचक म्हणून मान्यता दिली. तर विष्णू कडव, निलेश सांबरे, जयवंत डोंगरकर यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राला अनुक्रमे निलिमा भावर, हबीब शेख व महेंद्र भोणे यांनी अनुक्रमे सूचक म्हणून मान्यता दिली. दुपारी 3 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी झाल्यानंतर सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर 15 मिनिटे उमेदवारी मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आली होती. त्यानुसार अध्यक्षपदाच्या उमेदवार मनिषा बुधर व सुरेखा थेतले यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे भारती कामडी यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदाचे उमेदवार विष्णु लक्ष्मण कडव व जयवंत दामु डोंगरकर यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे निलेश सांबरे यांची बिनविरोध निवड झाली.
दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपजिल्हाधिकारी किरण महाजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) टी. ओ. चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) तुषार माळी, तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती उपस्थित होते.