1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान राबवली जाणार मोहीम

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 25 : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित, पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे तसेच जलजन्य रोगांच्या प्रदुर्भावावर नियंत्रण ठेवले जावे, यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 11 हजार 806 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची सर्वेक्षण मोहीम 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2019 या काळात राबवण्यात येणार आहे.
पिण्याचे पाणी, परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता या घटकांचा आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकाना शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. यासाठी पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमामध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्व अनन्यसाधारण असून वैयक्तिक सवयी, सार्वजनिक स्वच्छता व नळ पाणी पुरवठा यातील तांत्रिक दोष, देखभाल व दुरुस्ती या कारणांमुळे पाणी दुषित होते. हे दुषित पाणी पिण्यासाठी वापरल्याने विविध जलजन्य आजार होऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात असणार्या सर्व गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात मोहीम स्वरूपात करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून आलेले दोष नष्ट करून साथरोगास प्रतिबंध केला जातो. यासाठी पिण्याचे पाणी सुरक्षित रहावे म्हणून शुद्धीकरण व प्रयोगशाळेत पाणी नमुन्यांची तपासणी केली जाईल. यानंतर पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत शुद्ध पाणी पुरवठा करणार्या ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड देण्यात येणार आहेत.
मानवी आहारात पाणी हा महत्वाचा घटक असून पाण्याची गुणवत्ता राखण्याकडे आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. गावच्या वैयक्तिक सवयी, पाण्याचा वापर, सांडपाण्याचा निचरा, पाणी पुरवठा योजनेतील दुरुस्ती आणि देखभाल या बाबी यात महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताजवळ ग्रामस्थांनी स्वच्छता पाळावी. आपल्या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले रहावे याकरिता व गावात कोणताही जलजन्य आजार होऊ नये यासाठी जलसुरक्षकांनी गावातील प्रत्येक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करून घ्यावे तसेच पाणी नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, स्त्रोत दुषित असल्यास त्यावर योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी केले आहे.