राजतंत्र न्युज नेटवर्क
मुंबई, दि. २६ : शासन आणि खासगी संस्थांद्वारे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांद्वारे एकत्रित राबविण्यात येणार्या सहभागांतर्गत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध सामंजस्य करार करण्यात आले. यात पालघर जिल्ह्यासाठी शाश्वत विकासाचे मॉडेल तयार करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टाटा मोटर्स तसेच जेएम फायनान्शियल ग्रुप सोबत करार केला आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंघल, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आदींसह विविध कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुखमंत्री म्हणाले की, शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास करणे शक्य आहे. खासगी कंपन्यांकडे असलेले कौशल्य आणि शासकीय यंत्रणांचा एकत्रित वापर करून समाजातील मागास भागात विकासाची कामे करण्यासाठी सहभाग या उपक्रमाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. यापूर्वी खासगी संस्थांच्या मदतीने शासनाने राज्यातील एक हजार गावांचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. विकासाच्या निकषाचे सर्वात कमी मानांकने असलेली गावे यासाठी निवडण्यात आली आहेत. या गावात अतिशय चांगले काम होत आहे. लवकरच या गावांना जागतिक दर्जाची विकासाची मानांकने प्राप्त होतील, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
आज येथे झालेल्या सामंजस्य करारांमुळे खासगी संस्था आणि शासन यांच्यातील परस्परांवरील विश्वास वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे. आरोग्य, स्वच्छता, शालेय शिक्षण, महिला विकास या शिवाय अनेक क्षेत्रात काम करण्यासाठी खासगी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी सहभागसारखा प्लॅटफार्म त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. मोठ्या संस्था, स्टार्ट अप याशिवाय वैयक्तिक पातळीवरही हा सहभाग नोंदविण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवाहन केले. यावेळी पालघर जिल्हा प्रशासनाचा टाटा मोटर्स तसेच जेएम फायनान्शियल ग्रुपसोबत झालेल्या करारासह एकूण 11 सामंजस्य करार करण्यात आले. यात अमेझॉन या संस्थेसोबत बचत गटातील महिलांच्या उत्पादनांसाठी बाजार पेठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच अदिवासी कलावंतांच्या कलाकृतींसाठी अदिवासी विकास विभागाने करार केला. तर महिला आर्थिक विकास महामंडळाने अदिवासी भागातील स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नाचा सातत्याने मागोवा घेता यावा यासाठी फार्म इझी या कंपनीसोबत करार केला. दरम्यान, शासनातील विविध विभागांना योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेले संशोधन करण्यासाठी प्रथमच शैक्षणिक संस्थांना जबाबदारी देण्याचे ठरले असुन यासाठी सेंट झेवियर्स या संस्थेशी करार करण्यात आला. शेतकर्यांच्या उत्पादनाला ब्रॅण्डींग, रिटेलिंग आणि इतर व्यावसायिक मॅनेजमेंटसाठी आदिवासी विकास विभागाने माईंड ट्री या संस्थेशी करार केला आहे. बीवीजी अर्थात भारत विकास ग्रुप इंडिया यांनी अदिवासी विकास विभागासह केलेल्या करारानुसार अँब्युलन्स आणि आयुषच्या डॉक्टरांची अदिवासी भागात मदत याचा समावेश आहे. अमेय लाईफ हे हेल्थ डेटाबेससाठी काम करणार आहेत. तर स्काय वॉक सोशल व्हेंचर आणि ट्रान्सएण्ड अॅडवेंचर्स यांनी आदिवासी विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे एव्हरेस्ट शिखर गाठले त्या शौर्य मिशनप्रमाणे अदिवासी मुलांना विविध खेळात प्राविण्य मिळविण्यास मदत करणार आहेत.
यावेळी मेझॉनच्या अर्चना व्होरा, टाटा मोटर्सचे विनोद कुळकर्णी, संहिता सोशल व्हेंचर्सच्या प्रिया नाईक, जे एम फायनान्शियल ग्रुपच्या दिप्ती निलकंठन, सेंट झेवियर्सचे प्राचार्य डॉ. अन्जिलो मेनेझेस, फार्मइजीचे सिद्धार्थ शाह, बी.व्ही.जी.चे हनमंत गायकवाड, अमेयाचे डॉ. प्रसाद, ट्रान्सएण्ड अॅडवेंचर्सचे अविनाश देउस्कर आदींनी शासनासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच या उपक्रमाला यशस्वी करण्याचे आश्वासनही दिले. मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी सहभाग उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सगळ्यांचे सहकार्य मिळावे, असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
Home संग्राह्य बातम्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाचा टाटा मोटर्स व जेएम फायनान्शियल ग्रुपसोबत...