
वार्ताहर/बोईसर, दि. 25 : भगतसिंग कोशियारी समितीचा अहवाल पूर्णतः लागू करा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, आदी प्रमुख मागण्यांसाठी आज ईपीएस-95 पेन्शनधारकांनी खासदार राजेंद्र गावीत यांच्या पालघर येथील निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन करुन आक्रोश व्यक्त केला.
केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी वगळता देशभरातील कामगारांसाठी केंद्र सरकारने 1995 साली पेन्शन योजना सुरु केली. या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घ्यायचा असे तेव्हा ठरले होते. मात्र आढावा न घेतला गेल्याने गेल्या 21 वर्षात या योजनेद्वारे मिळणार्या पेन्शनमध्ये अद्याप वृध्दी झालेली नाही व निवृत्तांना किमान दोनशे ते कमाल दीड हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळत आहे. याबाबत भाजप प्रवक्ते व राज्यसभा सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे 2012 साली तत्कालीन सरकारने भगतसिंग कोशियारी समितीची स्थापन केली. या समितीने किमान तीन हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्त्याची शिफारस केली होती. मात्र तत्कालीन सरकारने सदर शिफारशी पूर्णतः न स्विकारल्याने आम्ही सत्तेवर येताच कोशियारी समितीच्या संपुर्ण अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांनी 2014 च्या निवडणूक प्रचारात दिले होते. मात्र सत्तेवर येऊन पाच वर्षे झाली, दरम्यानच्या काळात संघटनेने वारंवार आंदोलनाद्वारे सरकारचे याप्रश्नी लक्षही वेधले. मात्र तरीही सरकार केवळ आश्वासन देऊनच वेळ मारुन नेत असल्याने याचा विरोध म्हणून जिल्ह्यातील पेन्शनधारकांनी आज खासदार राजेंद्र गावीत यांच्या निवासस्थानाबाहेर थाळीनाद आंदोलन केले.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा